आरंभ मराठी / धाराशिव
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात चर्चा सुरू आहेत. सुरू असलेल्या चर्चांना आणि विरोधाला समोर ठेवून राज्य सरकारने या महामार्गाचे सुधारित रेखांकन नुकतेच जाहीर केले आहे. या नव्या आराखड्यात धाराशिव जिल्ह्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे दिसून येत असून काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी काहींना नव्याने फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अधिसूचनेनंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांसह एकूण १२ जिल्ह्यांत या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.
शेती जमीन जाण्याच्या भीतीमुळे अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले होते. या वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारने महामार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यात सातारा जिल्ह्याचा समावेश करून महामार्गाची लांबी ८०२ किलोमीटरवरून ८५६ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली.
पूर्वीच्या आराखड्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील १९ गावांचा महामार्गात समावेश होता. यामध्ये धाराशिव तालुक्यातील १७ आणि तुळजापूर तालुक्यातील २ गावांचा समावेश होता. मात्र सुधारित रेखांकनात तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी आणि खुंटेवाडी ही गावे वगळण्यात आली असून आता केवळ धाराशिव तालुक्यातील १७ गावांमधूनच महामार्ग जाणार आहे.
नवीन रेखांकनानुसार महामार्ग काहीसा दक्षिणेकडे सरकला असून मेडसिंगा, शेकापूर, गावसुद, पोहनेर आणि बेगडा या गावांतील काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर काही भाग नव्याने बाधित होणार आहे. जुन्या आराखड्यानुसार हा महामार्ग तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातून गावसुद मार्गे जाणार होता.
मात्र नव्या आराखड्यानुसार तो मेडसिंगा व शेकापूरकडे सरकत सुमारे दीड किलोमीटर दक्षिणेकडे वळवण्यात आला आहे. आता हा महामार्ग वडगावजवळील सिद्धेश्वर मंदिर परिसरातून वरवंटी शिवारात प्रवेश करणार असून याच ठिकाणी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला छेद देणार आहे. पुढे वरवंटी गाव आणि तलाव यांच्या मधून पोहनेर शिवारातून जात बेगडा व सुर्डी मार्गे बार्शी तालुक्यात प्रवेश करणार आहे. विशेषतः पोहनेर परिसरात जमीन बाधित होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पूर्वीच्या रेखांकनानुसार धाराशिव जिल्ह्यात सुमारे ४६ किलोमीटर लांबीसाठी ४६८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित होते. नवीन आराखड्यात ही आकडेवारी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नसली तरी महामार्गाची लांबी ४५ ते ४८ किलोमीटरदरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एकूण लांबीमध्ये फारसा फरक पडलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.
महामार्गाचे रेखांकन बदलल्यामुळे काही गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नव्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील बाधित गावांमध्ये या महामार्गाबाबत जोरदार चर्चा सुरू असून भविष्यात पुन्हा विरोधाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन रेखांकनुसार पुन्हा एकदा जमिनीची मोजणी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष मोजणी सुरू झाल्यानंतरच बाधित शेतकरी आणि त्यांच्या शेतीचे गट समोर येणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असून, कसल्याही परिस्थितीत महायुती सरकार हा प्रोजेक्ट पुढे नेणार आहे.
सहा पदरी असलेल्या या महामार्गाची रुंदी शंभर मीटर असून, याचा बाधित शेतकऱ्यांना मात्र काहीच लाभ होणार नाही. भरपाईचा मुद्दा हा यातील अतिशय कळीचा मुद्दा असून, त्यालाच शेतकऱ्यांचा प्रामुख्याने विरोध आहे. नव्या रेखांकनाला शेतकरी कसा प्रतिसाद देतात हे येणाऱ्या काही दिवसात समजणार आहे.








