आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला खंडेराव चौरे, सुरेश देशमुख, नितीन काळे, अॅड. अनिल काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, सौ. अस्मिता कांबळे तसेच महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रितीताई कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्येक बूथवर किमान एक तरी छोटा-मोठा उद्योजक घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि युवकांना स्वावलंबी बनवणे, हा पक्षाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या त्याग, परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळेच भाजपाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले.
याच बळावर आज पक्ष जिल्हा, राज्य आणि केंद्रात सत्तेवर आहे, असे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथ स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.









