आरंभ मराठी / धाराशिव
भूम–परंडा–वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी तब्बल ८० लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करण्याचा निर्णय घेतला असून, या निधीतून मतदारसंघातील १६० पानंद (शेत) रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतमाल बाजारपेठेत पोहोचवताना होणारी गैरसोय, पावसाळ्यात चिखलातून वाट काढण्याचा त्रास आणि वाहतुकीतील अडथळे या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिलेला निधी आरटीजीएस (RTGS) द्वारे जिल्हा परिषद खात्यात वर्ग करण्यात आला असून, कामांची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून,
भूम तालुका – ६० रस्ते
परंडा तालुका – ६० रस्ते
वाशी तालुका – ४० रस्ते
अशा एकूण १६० शेतरस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सावंत यांच्या ८० लाखांच्या योगदानासोबतच इतर निधीची जोड मिळाल्याने एकूण २ कोटी ४० लाख रुपयांचे रस्ते विकासकाम साकार होणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मोठी चालना मिळणार असून, शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यामुळे शेतमाल वेळेत बाजारात पोहोचेल आणि बळीराजाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या निर्णयाचे संपूर्ण मतदारसंघातून स्वागत होत असून, शेतकरी वर्गाकडून सावंत यांचे आभार मानले जात आहेत.









