आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या 55 गटांसह पंचायत समितीच्या 110 गणांसाठी जिल्ह्यातील एकूण 1308 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. मात्र, निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या पहिल्या चार तासांच्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळी साडेसात ते साडेअकरा या पहिल्या चार तासांत धाराशिव जिल्ह्यात जवळपास 22 टक्के मतदान झाले असून प्रत्यक्षात एकूण मतदानाची सरासरी 21.89 टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. पहिल्या चार तासांत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 50 हजार 792 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, तुळजापूर तालुक्यात पहिल्या चार तासांत सर्वाधिक 23.55 टक्के मतदान झाले असून येथे एकूण 45,895 मतदारांनी मतदान केले आहे.
भूम तालुक्यात 23,778 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 23.28 इतकी आहे.
परंडा तालुक्यात 23,933 इतके मतदान झाले असून टक्केवारी 22.31 आहे. लोहारा तालुक्यात 19,870 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 22.23 इतकी नोंदवण्यात आली आहे. वाशी तालुक्यात 14,557 मतदान झाले असून तेथील टक्केवारी 21.85 आहे. कळंब तालुक्यात 35,381 इतके मतदान झाले असून टक्केवारी 21.70 इतकी आहे. धाराशिव तालुक्यात संख्येने सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 52,034 मतदारांनी मतदान केले आहे.
मात्र टक्केवारीच्या दृष्टीने धाराशिव तालुका 20.82 टक्के इतकाच राहिला आहे. तर उमरगा तालुक्यात एकूण 35,344 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 20.47 इतकी असून ही जिल्ह्यातील सर्वात कमी टक्केवारी आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 11 लाख 45 हजार 888 मतदार असून यामध्ये 6 लाख 5 हजार 843 पुरुष आणि 5 लाख 40 हजार 37 महिला मतदार आहेत. पहिल्या चार तासांत 1 लाख 44 हजार 701 पुरुष मतदारांनी तर 1 लाख 6 हजार 90 महिला मतदारांनी मतदान केले आहे.
पहिल्या चार तासांत झालेली मतदानाची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी असून मतदानाचा टक्का वाढवणे हे मोठे आव्हान उमेदवारांसह प्रशासनासमोर उभे राहिले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांकडूनही प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










