आरंभ मराठी / धाराशिव
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या दोन वर्षांपासून लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील बुधवारी (दि.१७) धाराशिवच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बुधवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजता ते धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १५१ फुटी स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन करणार आहेत.
या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला धाराशिव शहरात स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन होणार असल्यामुळे या कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी मराठा सेवकांनी सुरू केली आहे. या यावेळी जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा सेवकांची बैठक घेऊन हैदराबाद गॅझेट संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटमध्ये धाराशिव जिल्ह्यातील अनेक मराठ्यांच्या नोंदी असूनही, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे. या दौऱ्यातील त्यांच्या भाषणाकडेही संपूर्ण मराठा समाजाचे तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. धाराशिवमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सभेतून जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या पुढील लढ्याची दिशा जाहीर करू शकतात. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याला विरोध केला आहे त्यामुळे जरांगे पाटील यांनीही भुजबळ यांच्याविरोधात आता कठोर भूमिका घेतली आहे. या दौऱ्यात ते यावरही भाष्य करू शकतात. सध्या मराठा सेवकांनी या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.