आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील येथील ग्रामपंचायतीत 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुमारे 4 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून सुभाष महादेव कळसुले (रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) व सावंत एम.आर. (रा. टाकळी बे., ता. जि. धाराशिव) यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
फिर्यादी संजय संतराव ढाकणे (वय 55), विस्तार अधिकारी, पंचायत समिती धाराशिव यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी दिनांक 1 जून 2022 ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ग्रामपंचायत करजखेडा येथे 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या एकूण 4,20,000 रुपयांच्या निधीचा अपहार केला.
तपासादरम्यान संबंधित निधीचा विनियोग नियमानुसार न करता त्याचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 409 (विश्वासघात), 420 (फसवणूक) व 34 (सहकार्याने गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









