‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे गौरव करण्यात आला. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुजार यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत जिल्हा, विभाग व राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल कामकाजाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात कार्यालयांचे संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) या सात महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत दोन टप्प्यांत सखोल मूल्यमापन प्रक्रिया पार पडली. राज्यातील एकूण ३६ जिल्हाधिकारी कार्यालयांपैकी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर, नागरिकाभिमुख सेवा आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे या मूल्यमापनातून स्पष्ट झाले.
या यशाबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे आभार मानले. पुजार यांनी या सन्मानाचे श्रेय जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देत त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. भविष्यातही धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अधिक प्रभावी प्रशासनासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या गौरवामुळे धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेची राज्यस्तरावर नोंद झाली असून, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने जिल्हा वेगाने वाटचाल करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.








