आरंभ मराठी / धाराशिव
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आश्वासनावरून राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण केल्यानंतर मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईवरून आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास जून महिन्यात पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यभरात बैठका आणि संवाद सुरू होते.
मात्र, करमाळा येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी एक महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, राज्यभरातील त्यांचे नियमित दौरे पुढील एक वर्षासाठी थांबवण्यात येतील. जरांगे पाटील म्हणाले की, “मला मारण्याच्या धमक्या येत आहेत.
माझ्यावर घात होऊ शकतो अशी भीती वाटते. मी मराठा समाजासाठी लढतो आहे; मात्र रोज धमक्या येत आहेत. यात माझे कुटुंबही डावावर लागले आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी मरणाला घाबरत नाही. पण आता मला कार्यक्रमांना बोलावणे थांबवा. मला माझे काम करू द्या. कधी कुणी येऊन मारून टाकेल, अशी परिस्थिती आहे.” धमक्यांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव राज्यभरातील दौरे वर्षभरासाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सततच्या उपोषणांमुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. “दर पंधरा दिवसांनी उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते.
सलाईन लावायला शीरही सापडत नाही, अशी अवस्था झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरोग्याच्या कारणास्तवही हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जरांगे पाटील यांच्या या अचानक निर्णयामुळे मराठा समाजाला धक्का बसला आहे. काहींनी त्यांच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.









