आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच धाराशिव जिल्ह्यातून अत्यंत थरारक आणि धक्कादायक निकाल समोर आला आहे. पंचायत समितीच्या ढोकी गणातून शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार अमर अनंतराव समुद्रे यांनी भाजपचे उमेदवार निहाल कलीमुद्दीन काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या निकालाने एक-एक मताचे महत्त्व अधोरेखित करत संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.
अमर समुद्रे यांना ३,१८७ मते मिळाली, तर निहाल काझी यांना ३,१८६ मते मिळाली. विशेष म्हणजे, पहिल्या फेरीतील मतमोजणीत निहाल काझी हे १५ मतांनी आघाडीवर होते. या आघाडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही सुरू केला होता. मात्र, पुन्हा करण्यात आलेल्या मतमोजणीत चित्र पूर्णपणे पालटले. अवघ्या दहा मिनिटांत निकाल उलटला आणि अमर समुद्रे हे एक मताने विजयी ठरले.
या अनपेक्षित आणि थरारक निकालामुळे ढोकी गणासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीत प्रत्येक मत किती निर्णायक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. दरम्यान, गोवर्धनवाडी गणातून शिवसेना (उबाठा) पक्षाचे सुशील काकडे यांनी ४२० मतांनी दणदणीत विजय मिळवला. तसेच, ढोकी गणातूनच शिवसेना (उबाठा)चे तीर्थराज घाडगे यांनी १,१६३ मतांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष बाब म्हणजे, ढोकी येथील तीनही जागा शिवसेना (उबाठा) पक्षाने जिंकत क्लीन स्वीप केला. या विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधी गटात मात्र निराशेचे वातावरण आहे.









