आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत गोंधळ उफाळून आला असून, युवा सेनेचे पदाधिकारी अविनाश खापे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याच्या मुद्द्यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अविनाश खापे यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्र काढण्यात आल्याचा दावा करण्यात येत असताना, या कारवाईची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांनाच नसल्याचे समोर आल्याने पक्षाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात अविनाश खापे यांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यासोबत झालेला फोनवरील संभाषणाचा ऑडिओ रेकॉर्ड समाजमाध्यमांवर व्हायरल केला होता. या ऑडिओमध्ये खापे यांनी सामान्य शिवसैनिकांच्या भावना व्यक्त करत जिल्ह्यात भाजपा शिवसेनेला संपवत असून, संपर्कप्रमुख राजन साळवी हे भाजपाला पूरक भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता.
इतकेच नव्हे तर, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म संपर्कप्रमुखांनी भाजप नेत्यांकडे नेऊन दिल्याचा आरोपही खापे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या या भूमिकेला जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. या घडामोडीनंतर रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक व संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. अविनाश खापे यांनी कॉल रेकॉर्ड व्हायरल केल्याचा प्रकार पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना रुचला नसून, त्यांनी खापे यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.
या घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी युवा सेनेचे सचिव राहुल लोंढे यांनी पत्र काढून अविनाश खापे यांना पक्षातून निलंबित केल्याचे जाहीर केले. मात्र, आरंभ मराठीने यासंदर्भात संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कुठल्याही निलंबन पत्राबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता स्थानिक पातळीवरूनच ही कारवाई करण्यात आली का, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अविनाश खापे यांनी निलंबनाचे पत्र मिळाले असल्याची कबुली दिली असून, या कारवाईबाबत दोन दिवसांत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, संपर्कप्रमुखांनाच माहिती नसलेली ही कारवाई कशी झाली, याबाबत त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
दुसरीकडे, शिवसेना व भाजपा यांच्यात जागावाटपावरून निर्माण झालेला वाद पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार राणा पाटील यांच्यातील चर्चेनंतर मिटला असून, महायुती म्हणून जिल्ह्यात एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. पळसप येथील जिल्हा परिषद गटात भाजप नेते नेताजी पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली असली, तरी एका अपक्ष उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष मदत मिळत असल्याचा आरोप होत आहे.
तसेच धाराशिव व कळंब तालुक्यात जिथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उभे आहेत, तेथे भाजपकडून अपक्ष उमेदवारांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप शिवसैनिक अजूनही करत आहेत. या सर्व घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत पक्षांतर्गत विसंवाद, अस्वस्थता आणि गोंधळ वाढल्याचे स्पष्ट दिसत असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा अंतर्गत संघर्ष पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.









