आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेतील शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाच्या चार नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, उबाठा गटाचे नगरसेवक सचिन पवार यांच्यासह ज्ञानेश्वरी राज निकम, सोनाली रवी वाघमारे हे तीन नगरसेवक शिवसेना उबाठा गटातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सात पैकी चार नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतरही पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा उपस्थित होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे आणि केसरबाई ज्ञानदेव करवर या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत अमित उंबरे आणि ज्ञानदेव करवर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे धाराशिव शहरातील शिवसेनेच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः नगरपालिकेतील उबाठा गटाची संख्या कमी झाल्याने आगामी काळात गटनेतेपद आणि पक्षीय संख्याबळाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, चार नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदी लागू होतात का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अन्य नगरसेवकांची भूमिका काय राहणार आणि या पक्षप्रवेशाला कायदेशीर आव्हान दिले जाणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या पक्षप्रवेशावेळी सूरज साळुंके, सोमनाथ गुरव, ऋषिकेश मगर आणि सह्याद्री राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती.









