धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत कामांची स्थगिती उठविण्याबाबत पालकमंत्री सरनाईक यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिल्यापासून जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. 3 महिने लोटले तरी कामावरील स्थगिती कायम आहे. यामुळे सरकारविरोधात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता निधी वाटपावरून महायुतीअंतर्गत चढाओढ सुरू असून, याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान करून महायुतीमध्ये भाजप पक्ष कसा वरचढ आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आता पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खंत व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. या पत्रात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निधीबाबत केलेल्या तक्रारीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.तसेच यासंदर्भात आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असेही म्हटले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना जिल्ह्याचा विकास हवाय की कुरघोड्या,असा प्रश्न उपस्थित झाला आहे. निधी वाटपावरून स्पर्धा करणारे लोकप्रतिनिधी विकासाची स्पर्धा कधी करणार,असे प्रश्न विचारले जात आहेत.
पालकमंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काय म्हटले ..?
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या जानेवारी-२०२५ च्या पहिल्याच बैठकीत सर्व महाराष्ट्र सदस्योंच्या संमतीने निधीच्या वितरणाबाबत सविस्तर चर्चा होऊन त्यानुसार धाराशिवमधील सर्व मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी निधीचे नियोजन करण्यात आलेले होते.
सदर बैठकीत तुळजापूरचे स्थानिक आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावेळेस निधी वितरणाबाबत कोणताही आक्षेप नोंदवलेला नव्हता. तथापि, अर्थसंकल्पीय अधिवेशन काळाच्या दरम्यान निधी वितरणाबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व आपल्याकडे तक्रार करून निधी वितरणाबाबत आक्षेप नोंदविला होता, त्याअनुषंगाने संबंधित निधी वितरणाबर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व आपल्या संमतीने स्थगिती देण्यात आली होती.
–
गेल्यावर्षीचा निधी शिल्लक राहिलेला एकमेव धाराशिव जिल्हा,
धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेचा २०२४-२५ चा उर्वरीत निधी हा तत्कालीन पालकमंत्री महोदयांच्या कार्यकाळातील निधीपैकी उर्वरीत निधी होता. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे अवलोकन केले असता, धाराशिव जिल्हा वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०२४-२५ चे निधी वितरण शिल्लक राहिले नव्हते. सदर निधीचे वितरण तत्कालीन पालकमंत्री महोदयांनी ज्या सुत्राच्या आधारे धाराशिव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय केले होते, त्याच सुत्रानुसार मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय निधीचे वितरण केले आहे. सर्व सदस्यांच्या संमतीने पुर्वीच्या सूत्रानुसार केलेले होते.
_
आमदार राणा पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही,
पालकमंत्री सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, सदर निधी वितरणाची स्थगिती लागू झाल्यानंतरच्या कालावधीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माझ्याशी यासंदर्भात कोणताही संवाद साधलेला नाही, तसेच मी केलेल्या संपर्क प्रयत्नांनाही आमदार श्री. पाटील यांनी प्रतिसाद दिलेला नाही. अर्थमंत्री, अर्थ विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर सदर निधी वितरण स्थगितीबाबत ३-४ वेळा चर्चा होऊनही अद्यापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा (Aspirational District) असून सदर निधीच्या स्थगितीमुळे मागील तीन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामे (आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास, जलसंधारण व महावितरण विभागांच्या अत्यावश्यक योजनांची कामे) निधीअभावी रखडली असून ती जनता तथा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनमानाशी संबंधित आहेत, या जिल्ह्याचा मागासलेपणा लक्षात घेता ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
महाराष्ट्रात आपल्या सक्षम नेतृत्वात महायुतीचे सरकार असून सदरचे सरकार हे विकास कामांना स्थगिती देणारे सरकार नसून विकास कामांना प्राधान्य देणारे सरकार आहे”, अशी धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेत सरकारविषयी धारणा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्थगिती उठविण्याबाबत वारंवार पालकमंत्री या नात्याने माझ्याकडे विचारणा होत आहे.
तसेच, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निधी वितरणावरील स्थगिती उठवून निधी वितरण होणे अत्यावश्यक आहे. सदर निधी वितरण व स्थगिती उठविण्याबाबत उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांना विनंतीपूर्वक पत्र सादर करण्यात आले आहे. परंतु, अद्याप सदरबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व विभागांच्या कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी व निधी वितरणाची प्रक्रिया कशा प्रकारे राबवायची याबाबत स्वयंस्पष्ट मार्गदर्शक सूचना आपल्या मार्गदर्शनाखाली द्याव्यात, अशी विनंती धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपणांस करीत आहे, जेणेकरून धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळून संबंधित योजनांची मंजूर कामे त्वरीत सुरु होण्यास मदत होईल.