तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत पालकमंत्री सरनाईक यांचे निर्देश, मंत्रालयात बैठक, नवरात्र उत्सवात होणार तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन
मुंबई:
श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे.या शिल्पामध्ये श्री.तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे.परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आली आहे.
याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग,इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले.
याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात परस्पर प्रसिद्धी न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावी,असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना दिले
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी सकाळी मुंबईत पालकमंत्री सरनाईक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची बैठकीला दांडी
मंगळवारी पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या मंत्रालयातील बैठकीला छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी वृंद उपस्थित होते.मात्र, तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील या बैठकीला गैरहजर राहिले.
वर्षाला दीड कोटी भाविक, त्यांना चांगल्या सुविधा देऊ
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. सरनाईक म्हणाले की,महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी,तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे.तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता,प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात.त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला.या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.









