न्यायालयाची परवानगी असतानाही आझाद मैदानासाठी पोलिसांनी गर्दीचे कारण सांगून दिला होता नकार, आता नवी रणनीती
आरंभ मराठी / जालना
न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा बदलण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. १५ सप्टेंबरला केवळ दोन गाड्या, दोन रुग्णवाहिका आणि पाच जणांना सोबत घेऊन मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील पोलिस प्रशासनासमोर नवी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईला सोबत न येण्याचे आवाहन केले आहे. समाजाने यापूर्वी बुक केलेल्या गाड्या मात्र रद्द करू नयेत, उलट गरजेनुसार गाड्या वाढवाव्यात. मात्र मुंबईकडे कधी निघायचे, याबाबत आपल्या निरोपाची वाट पाहावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथील नियोजित मुक्काम कायम राहणार आहेत. मात्र कोणाच्या घरात किंवा मंगल कार्यालयात न थांबता सार्वजनिक ठिकाणी पत्रे टाकून मुक्कामाची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रकृती साथ देत असेल तरच मुक्कामाच्या ठिकाणी भाषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी पुन्हा व्यक्त केला. विशेष म्हणजे मोठा जमाव मुंबईत न आणता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस प्रशासनाची भूमिका आता अधिक कसोटीची ठरणार आहे.
दरम्यान, मुंबईच्या मार्गावर समाज बांधवांनी केवळ निरोप व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे. रस्त्यात भोजनाची व्यवस्था करू नये, असेही आवाहन त्यांनी केले. तसेच आंदोलनाच्या काळात गावोगावी आणि तालुका स्तरावर शांतता रॅली काढण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.











