आरंभ मराठी / धाराशिव
शेकडो कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या बार्शी-बोरफळ सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा उघड्यावर आला आहे. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याला तब्बल २५ ते ३० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर अद्याप वाहतूकही सुरू झालेली नाही. त्यामुळे कोट्यवधींच्या कामाचा दर्जा नेमका कोण तपासत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच दोन ठिकाणी लांबच लांब तडे गेले आहेत. स्थानिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिमेंट काँक्रिटच्या कामात आवश्यक तांत्रिक प्रक्रिया, काँक्रिटची गुणवत्ता आणि कामाच्या प्रत्येक टप्प्यावर होणारी तपासणी याकडे गांभीर्याने पाहिले जाते का, हा प्रश्न आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, डीएलसीच्या कामात आवश्यक ती गुणवत्ता राखली गेली नसल्यामुळे रस्त्याला तडे गेले असावेत. मात्र, या तड्यांचे नेमके कारण तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक आहे.
_

दोन किलोमीटरसाठी वर्षभर खोळंबा
जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या अवघ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम तब्बल वर्षभरापासून रखडले आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच तयार झालेल्या रस्त्याला वाहतूक सुरू होण्यापूर्वीच तडे गेल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. शहरातील रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे रखडलेली असताना त्यांना गती देण्याऐवजी कामाचा दर्जाच संशयास्पद ठरत असेल, तर या कामांवर खर्च होणाऱ्या सार्वजनिक पैशांचे उत्तरदायित्व कोणाचे, असा सवाल उपस्थित होत आहे.
_
श्रेयासाठी चढाओढ; दर्जावर मात्र मौन

धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांवरून राजकीय श्रेयाची चढाओढ सुरू आहे. सत्ताधारी पक्षांमध्येही कामांचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, रस्त्यांची संथ गती, रखडलेली कामे आणि आता समोर आलेले तडे यावर लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते मौन का बाळगून आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
_
व्हायब्रेटरचा वापर कुठे ? अभियंता पाहणीला येतो तरी का ?
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असून, धाराशिव शहरातील कामाच्या देखरेखीसाठी थर्ड पार्टी एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते. मग प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासली जाते तरी कशी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. काँक्रिटच्या कामात व्हायब्रेटरचा वापर करण्याची तरतूद निविदेत असतानाही प्रत्यक्ष कामात त्याचा वापर केला जातो का, याची तपासणी झाली आहे का, याचे उत्तर कोण देणार..?, कामाच्या ठिकाणी अभियंत्यांची नियमित उपस्थिती आणि गुणवत्तेची तपासणी होत नसेल तर कोट्यवधी रुपयांच्या या रस्त्याचा दर्जा कोण सांभाळणार, हा गंभीर प्रश्न आहे.










