आरंभ मराठी / धाराशिव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षासोबतच मतदारांशीही गद्दारी केली आहे. पक्षांतर करणाऱ्या या नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी तसेच त्यांना अपात्र ठरविण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली. धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी चार नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता या नगरसेवकांच्या अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत बोलताना तानाजी जाधवर म्हणाले की, मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विश्वास ठेवून या नगरसेवकांना निवडून दिले होते. मात्र, निवडून आल्यानंतर पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हा पक्षासोबतच मतदारांचाही विश्वासघात आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या नगरसेवकांविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्यात येणार असून, त्यांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल. दरम्यान, पक्षाच्या भूमिकेशी इमान राखत शिवसेना ठाकरे गटासोबत कायम राहिलेले नगरसेवक रवी वाघमारे आणि राज निकम यांच्याबद्दल पक्षाला अभिमान असल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केल्याचेही जाधवर यांनी सांगितले. कोणत्याही ‘पेट्या-खोके’ अथवा अन्य अमिषाला बळी न पडता पक्षाशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या या दोन्ही नगरसेवकांचे त्यांनी कौतुक केले. धाराशिव नगरपालिकेतील सातपैकी चार नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने ठाकरे गटाची नगरपालिकेतील संख्या आता तीनवर आली आहे. मात्र, पक्षांतर केलेल्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने आगामी काळात हा विषय न्यायालयीन पातळीवर जाण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे धाराशिव नगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता असून, पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व टिकणार की त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










