महायुतीचा जल्लोष; जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा
आरंभ मराठी / धाराशिव
अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर अखेर धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता काबीज करत इतिहास रचला आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निकालानंतर जिल्हा परिषद परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडत जल्लोष साजरा केला.
गेल्या तब्बल ३२ दिवसांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्ह्याबाहेर मुक्कामी होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच शुक्रवारी दुपारी सर्व सदस्य धाराशिवमध्ये दाखल झाले. निवडीपूर्वी महायुतीमध्येच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून चुरस निर्माण झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. मात्र अखेर चर्चेनंतर महायुतीचा फॉर्म्युला ठरला आणि भाजपकडून अर्चनाताई पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले.
निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अर्चनाताई पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषाताई गायकवाड यांना संधी देण्यात आली.
या निकालामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही लढत जिंकत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत निर्णायक यश मिळवले.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात अर्चनाताई पाटील यांना ४५ मते, तर विरोधी उमेदवाराला ९ मते मिळाली.
उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात उषाताई गायकवाड यांना ४५ मते, तर विरोधी उमेदवाराला १० मते मिळाली. महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या सदस्य लता मोरे या अध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सभागृहात पोहोचल्यामुळे त्यांना अध्यक्ष पदासाठी मतदान करता आले नाही; मात्र त्यांनी उपाध्यक्ष पदासाठी मतदान केले.
शिवसेना (उबाठा) पुरस्कृत लोणी गटातील विजयी उमेदवार राणी रेवण ढोरे यांचे एक मत महायुतीच्या बाजूने पडले असण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना (उबाठा) पक्षाचे सात सदस्य तसेच एक पुरस्कृत सदस्य आणि काँग्रेसचे तीन सदस्य असे महाविकास आघाडीकडे ११ मते असताना महाविकास आघाडीला फक्त १० मते मिळाली.
त्यामुळे एक मत फुटले आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर मोठा जल्लोष केला. गुलाल उधळत, फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. धाराशिवच्या राजकारणात ही निवड ऐतिहासिक मानली जात आहे.








