आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा परिषद आवारात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज सकाळी १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुतीच्या वतीने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, उमरगा येथील नगराध्यक्ष किरण गायकवाड तसेच अपक्ष उमेदवार धनंजय सावंत आदी उपस्थित होते. मात्र, यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
महायुतीकडून अध्यक्ष पदासाठी तेर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अर्चनाताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या कदेर गटातील विजयी उमेदवार उषाताई रविंद्र गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील समन्वयातून या दोन्ही उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत दोन्ही पदांसाठी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अध्यक्ष पदासाठी शिराढोण जिल्हा परिषद गटातील कांचनमाला संगवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी कवठा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे.
जिल्हा परिषदेमधील संख्याबळाचा विचार करता सध्या महायुतीकडे ४४ सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. मात्र, महाविकास आघाडीने देखील बिनविरोध निवड होणार नाही याची काळजी घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपल्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.
दुपारी २ वाजता सर्व सदस्य जिल्हा परिषदेत विशेष सभेसाठी एकत्र येणार आहेत. दुपारी २.३० वाजता अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून त्यानंतर २.४० वाजता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर लगेच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावे जाहीर होतील.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने परिसरात सुरक्षा वाढवून प्रवेशावर देखील नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात दिवसभर राजकीय हालचाली आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे.








