आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने दोन अपक्ष सदस्य गळाला लावल्यानंतर आता थेट आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची भेट घेतली असून, त्यामुळे भाजपच्या सत्ता स्थापनेला अधिक बळ मिळाले आहे. भाजपकडे बहुमताचा आकडा पूर्ण झाला असून, शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली तरी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 19 सदस्य निवडून आले असून, त्यापाठोपाठ शिवसेना पक्षाचे 15, शिवसेना उबाठा गटाचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला बहुमतासाठी आणखी 9 सदस्यांची गरज आहे. महायुती म्हणून भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य सोबत आहेत.
पण शिवसेनेतील आमदार डॉ तानाजी सावंत यांचा गट विरोधात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करताना भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज भासत असताना पक्ष नेतृत्वाने दोन अपक्ष उमेदवारांचा कालच पाठिंबा मिळवला होता.आता शिवसेना नेते आमदार डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचाही पाठिंबा मिळवला असून, या तिन्ही अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावरच भाजप जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करू शकते.मात्र,जिल्ह्यातील शिवसेनेचा दुसरा गट भाजपला साथ देण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळेच शिवसेनेचे काही सदस्य देखील भाजपच्या सदस्यांसोबत सहलीवर गेले आहेत.त्यामुळे आता भाजप सत्तेच्या अधिक जवळ असून, आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या गटाला वगळून भाजप सत्ता स्थापन करू शकते अशी एकंदर परिस्थिती आहे.
पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष,
धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार डॉ. तानाजी सावंत म्हणजेच थेट काकांना आव्हान देत परांडा तालुक्यातील जवळा गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. मात्र, आमदार डॉ .सावंत यांनी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार केल्यानंतर धनंजय सावंत कोणाच्या बाजूने जाणार याकडे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी सकाळी धनंजय सावंत यांनी भाजप युवा नेते मल्हार पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला असून, त्यामुळे आमदार डॉ. सावंत यांचा निर्धार पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे. धनंजय सावंत यांच्या आणि मल्हार पाटील यांच्या भेटीने भाजपकडे बहुमताचा आकडा पूर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे यदाकदाचित शिवसेनेच्या नेतृत्वाने भाजपसोबत सत्तेत न जाण्याची भूमिका घेतली तरी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 अपक्षांच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत सहजरित्या सत्ता स्थापन करू शकते.
त्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेला सदस्य फुटण्याची भीती
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे एकूण १५ सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये ८ सदस्य हे डॉ. तानाजीराव सावंत गटाचे आहेत. तर ५ सदस्य हे पालकमंत्री सरनाईक, शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या गटाचे आहेत. उर्वरित २ सदस्य हे मूळचे भाजपाचे कार्यकर्ते असून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
यामुळे शिवसेनेच्या १५ सदस्यांमध्ये एकूण तीन वेगवेगळे गट स्पष्टपणे दिसून येत आहेत. यापैकी २ सदस्य कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत राहण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते. परिणामी, जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसमोर भाजपसोबत जाण्याशिवाय फारसा पर्याय उरत नाही. जर शिवसेनेकडून याबाबत जास्त ताठर भूमिका घेतली गेली, तर सध्या पक्षात असलेले काही सदस्यही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वासमोर पक्ष एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.








