कामाचा उरक नसल्याने नागरिक त्रस्त
आरंभ मराठी / धाराशिव
नगर पालिकेच्या सत्तांतरानंतर धाराशिव शहरातील काही भागात १४० कोटीतून रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. तसेच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बार्शी ते बोरफळ रस्त्याचे काम पालिकेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे ४ महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले आहे.मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने विशेषतः विद्यार्थी जीव धोक्यात घालून मार्ग शोधत आहेत.
जिजाऊ चौक ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर केवळ एक बाजू तीही अर्धवट केल्याने वाहनधारक,विद्यार्थ्यांची अक्षरशः कसरत सुरू आहे.
मात्र प्रशासनातील अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. नागरिकांचे प्रचंड हाल सुरू असताना मतदान मागणारे नगरसेवक आणि पराभूत उमेदवार सगळे शांतपणे पाहत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्ते फोडण्याची जणू स्पर्धाच
बार्शी ते बोरफळ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने १ किलोमीटर कामासाठी ४ महिने घालवले. पुढे काम ठप्प आहे.लोकांचे हाल सुरू असताना याच ठेकेदाराने जिजाऊ चौक ते शरद पवार हायस्कूल रस्त्यावर एक बाजूचे खोदकाम सुरू केले आहे.
खोदकाम करून गायब होण्याची संधी ठेकेदार सोडत नाहीत आणि अशा कामचुकार ठेकेदाराला प्रशासनाकडून अभय मिळत असल्याने नागरिकांच्या नशीबी भोग कायम आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत मतदानासाठी फिरणारे चेहरेही आता गायब झाले आहेत.त्यांच्याकडून तरी न्याय मिळेल अशी जनतेला अपेक्षा आहे.









