आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्ता समीकरणासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचा तसेच पंचायत समितीचा निकाल जाहीर होताच भारतीय जनता पार्टीने पक्षातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच शिंदे गटातील शिवसेनेच्या काही सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवले असून, त्यामुळे सत्तासमीकरणासाठी येणाऱ्या काळात आणखी एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २८ सदस्यांची गरज आहे. एवढी सदस्य संख्या कोणत्याही एका पक्षाकडे नाही. मात्र महायुती म्हणून जवळपास ३९ सदस्य भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मात्र जिल्ह्यातील शिवसेनेत तीन गट आहेत या गटबाजीमुळे सत्ता स्थापनेत मोठा अडथळा निर्माण ठरू शकतो,ही बाब गांभीर्याने घेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने स्वतःच्या पक्षातील १९ सदस्यासह भाजप नेतृत्वाला मानणाऱ्या शिवसेनेतील काही सदस्यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवले आहे.
सोमवारी सायंकाळी अंगावरील गुलाल निघण्यापूर्वीच हे सगळे सदस्य आपापल्या मतदारसंघातून पुणे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यासाठी भाजपने स्वतंत्र यंत्रणा लावली आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून प्रशासनाकडे लवकरच बहुमताचा दावा केला जाईल.त्यानंतर अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल,असे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेतील एका गटाची साथ असल्याने भाजप सत्तेचा दावा करू शकते. कळंब आणि धाराशिव तालुक्यातील शिवसेना सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य भाजपच्या बाजूने जाऊ शकतात. म्हणजे भाजपला २८ जागेचा आकडा गाठणे शक्य आहे. शिवसेनेचे आमदार डॉ.तानाजी सावंत याचा भाजप नेतृत्वाला कडाडून विरोध आहे. त्यामुळे भूम-परांडा तालुक्यातील सदस्यांनी साथ नाही दिली तरी सत्तेत सहज जाता येईल, असे नियोजन भाजपने निकालादिवशीच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्षातील सदस्यांना गळाला लावल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,पुढील काही दिवसात राजकीय हालचाली कशा पद्धतीने बदलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीकडूनही खबरदारी; नवनिर्वाचित सदस्य तीर्थदर्शन सहलीवर –
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही दक्षतेची भूमिका घेत आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना तीर्थदर्शनासाठी पाठवले आहे. संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या तीर्थदर्शन सहलीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे ७ सदस्य, काँग्रेसचे ३ सदस्य, तसेच २ अपक्ष सदस्य आणि १ उबाठा पुरस्कृत सदस्य असे महाविकास आघाडीचे १३ सदस्य सहभागी आहेत. दरम्यान, घराणेशाहीला विरोध करणारी भूमिका घेणाऱ्या पक्षालाच पाठिंबा देण्याची भूमिका महाविकास आघाडीची राहील, असे महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्याचे अधिकार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिले असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीकडे सर्व पर्याय खुले असल्याचे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पुढील काही दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या घडामोडीवरून अनपेक्षीत युती आणि आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्ता स्थापनेसाठी करावी लागणार प्रतीक्षा
निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड करण्यासंदर्भात पत्र येते. त्यामध्ये दिलेल्या कालावधीच्या आत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या असतात. या पत्रावर विहित कालावधी दिलेला असतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडण्याच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाते. त्यामध्ये निश्चित कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीच्या आत बहुमत असणाऱ्या पक्षाने अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून सत्ता स्थापन करावी लागते. राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाल्याशिवाय त्याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही. राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त होताच राजकीय हालचाली वाढणार आहेत.










