आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात आज बुधवार (दि.४) सकाळी अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सकाळी ठीक ९.२६ वाजता आणि त्यानंतर ९.३६ वाजता कळंब, धाराशिव, तुळजापूर तसेच परिसरातील इतर भागांमध्ये भूगर्भातून आलेल्या गूढ व जोरदार आवाजांचे धक्के नागरिकांना जाणवले. या धक्क्यांची तीव्रता इतकी होती की, अनेक घरांच्या भिंती जोरात हलल्या, तर खिडक्या व दारे थरथरली.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर आले. काही वेळासाठी गावोगावी आणि शहरातील वसाहतींमध्ये लोक एकमेकांकडे धाव घेत चौकशी करू लागले. काही नागरिकांनी हा अनुभव भूकंपासारखा असल्याचे सांगितले, तर काहींनी जमिनीखालून मोठा स्फोट झाल्यासारखा प्रचंड आवाज ऐकू आल्याचे नमूद केले. काही सेकंदांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या आवाजांमागे भूगर्भातील हालचाल, नैसर्गिक दाबातील अचानक बदल, किंवा इतर तांत्रिक कारणे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध स्तरांवरून या घटनेचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
सोशल मीडियावर मात्र या घटनेनंतर भूकंप झाल्याचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अधिकृत यंत्रणांकडून अद्याप भूकंपाबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.








