आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) निकाल जाहीर केला. त्यात चार लाख ४६ हजार ७३० पैकी अवघे ११.२८ टक्केच (५० हजार ३६९) भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत तब्बल तीन लाख ९६ हजार ३२५ परीक्षार्थी म्हणजे जवळपास ४ लाख सध्याचे शिक्षक आणि भावी शिक्षक नापास झाले आहेत.
राजकीय चर्चांमध्ये या महत्त्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले आहे. या परीक्षेला सध्या नोकरीत असलेले अनेक शिक्षक आणि ज्यांना शिक्षक व्हायचे आहे, असेही शिक्षक परीक्षेला बसले होते.. यातून सध्याच्या व्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांचा आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिकून डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे यानिमित्ताने समोर आले आहे.
दर्जाहीन शिक्षणातून दर्जाहीन विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यातून पुन्हा उद्याचे दर्जा खालावलेले शिक्षक आणि त्यांच्या हातून दिले जाणारे पुन्हा तसे शिक्षण हे दृष्टचक्र या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे..
मान्य आहे की नोकरीत असणाऱ्या शिक्षकांना या परीक्षेची सक्ती करावी का ? यावर वाद होऊ शकतो. ती शक्ती कोणत्या तारखेपासून करावी ? यावरही वाद होऊ शकतो. त्याचप्रमाणे नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असावा का ? यावरही नक्कीच चर्चा होऊ शकते. त्या मुद्द्यांवर मी शिक्षकांच्या सोबत आहे किंबहुना राज्यातील शिक्षकच काय सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी ज्ञान अद्ययावत होणारी परीक्षा असली पाहिजे व त्या परीक्षेच्या आधारे चे वेतनवाढ दिली पाहिजे. यामुळे शिक्षकांसह घटक वाचन करतील.अभ्यास करतील पण तो विषय वेगळा आहे..
परीक्षेला बसलेले नोकरीतील शिक्षक आणि भावी शिक्षकांची ही दयनीय अवस्था हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे दिसणारे रूप यावर आपण चर्चा करणार आहोत की नाही..? नोकरी लागल्यानंतर शिक्षकांना त्यांनी स्वतःला update ठेवावे वाचन करावे ही अपेक्षा आहे.. वर्षाभरात १४५ दिवस सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यांमध्ये तर कोणतेही अशैक्षणिक काम नसते ना ? या सुट्ट्यांमध्ये स्वतःला अद्ययावत करणे वाचन करणे नक्कीच शक्य आहे.. मी शिक्षक म्हणून काम केले,आज माझ्या घरी विकत घेतलेली ९०० पुस्तके आहेत व रिकाम्या वेळेत मी फक्त आणि फक्त वाचनच केले..
पण तरीही आज शिक्षक समुदाय अशैक्षणिक काम ही ढाल करून स्वतः समृद्ध होण्याचे नाकारत आहे., आमची नोकरी ही तुम्ही स्वतःला किती समृद्ध केले हे मागत नाही त्या आधारे शिक्षकांना वेतन वाढ दिली जात नाही त्या आधारे शिक्षकांचे मूल्यमापन होत नाही..
पुस्तके लिहिणारा शिक्षक आणि वर्तमानपत्र न वाचता नोकरी करणारा शिक्षक दोघांनाही सारखीच वेतन वाढ दिली जाते.
नोकरीतील सुरक्षितता ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला काहीच केले नाही तरी चालेल असा संदेश देते आणि कधीतरी शिकलेल्या पुस्तकांच्या आधारे लहान मुलांना शिकवायला काय लागते ? अशी मानसिकता करून अनेक जण जगत असतात… या परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांचा दर्जा हा या अर्थाने सन्माननीय अपवाद वगळता प्रातिनिधिक आहे.. इथून पुढे दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर हेच सत्य अधोरेखित होताना आपल्याला दिसणार आहे..
अनेक जण असे म्हणतील की या परीक्षेला राज्यातील कमी शिक्षक बसले व भावी शिक्षकांची संख्या मोठी होती पण ते भावी शिक्षक सुद्धा याच शिक्षण व्यवस्थेचे अपत्ये आहेत म्हणजे ते नापास होणारे विद्यार्थी सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवतात. हे यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.. त्यामुळे नोकरीतले शिक्षक की विद्यार्थी शिक्षक हा वादविवाद करण्यापेक्षा आमची शिक्षण व्यवस्था नापास होते आहे याबद्दल चर्चा व्हायला हवी
नोकरीतले शिक्षक स्वतःला समृद्ध करत नाहीत. पुस्तक वाचत नाही. याबाबत काय करता येईल ?याची चर्चा करायला हवी. तेव्हा TET सक्ती असावी की नसावी याचा कीस जरूर काढूया…त्याबाबत आंदोलने करूया.. पण परीक्षा असेल किंवा नसेल आपण स्वतःला समृद्ध करणार आहोत की नाही ? आम्ही वाचन करणार आहोत की नाही ?आम्ही सुट्टीचा सदुपयोग स्वतःच्या समृद्धीसाठी करणार आहोत की नाही ? हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे ..
ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक ग.प्र.प्रधान यांची एकदा मुलाखत घेतली होती. ते म्हणाले नोकरीला लागल्यावर सुट्टी लागण्यापूर्वी त्यांचे जेष्ठ शिक्षक यांनी त्यांना ४० इंग्रजी पुस्तकांची यादी दिली व शाळा कॉलेज उघडल्यानंतर पुस्तकांमध्ये काय वाचले याच्या नोट्स मागितल्या.. मी प्रधान सराना म्हणालो की आजचे शिक्षक म्हणतात बाकीचा समाज इतका बिघडला आहे, तुम्ही शिक्षकांच्याच मागे कधी लागणार ? तेव्हा संतापलेले प्रधान सर मला अजूनही आठवतात .ते म्हणाले किती दिवस तुम्ही समाजाच्या मागे लपणार आहात..? अंत:प्रेरणा नावाची काही गोष्ट तुमच्याकडे आहे की नाही ?
अंतर्मुख होऊ या…
हेरंब कुलकर्णी








