मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात तुळजापूरमध्ये, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलेली पोस्ट चर्चेत
आरंभ मराठी / धाराशिव
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी निवडणुकीदरम्यान फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत फेसबुक पोस्ट केली असून, त्यात देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे सांगत आहेत . वास्तविक सरकार स्थापन होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आज तुळजाभवानी मातेच्या दरबारातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.
आमदार कैलास पाटील यांचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत आपले मनःपूर्वक स्वागत!
मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण धाराशिव जिल्ह्यात येत आहात, यानिमित्ताने आपल्याला एक महत्त्वपूर्ण आठवण करून देऊ इच्छितो.. निवडणुकीच्या प्रचारावेळी आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती.. तसा निर्णयही आपल्या तत्कालीन सरकारने घेतला असल्याचे शब्द तुमचेच होते.. माझ्या धाराशिवसह तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या या शब्दावर विश्वास टाकून आपल्या पदरी भरभरून यश दिले. आता तो शब्द पाळण्याची नैतिक जबाबदारी तुमचीच आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात न करण्याची जबाबदारी तुमचीच आहे..
आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र दरबारातून आपण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तुम्ही आज कराल व आपल्या शब्दाला जागाल, अशी आशा धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना लागून आहे.
शेतकऱ्याविषयी आपले प्रेम खरे असेल तर आपणच केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी वाट कसली पाहताय ?