आरंभ मराठी / धाराशिव
भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर निघालेले शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक आता पुन्हा शिवसेनेकडे वळले आहेत. धाराशिव शहरातील चार नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
धाराशिव शहरातील चार ते पाच नगरसेवक शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी सोमवारी दुपारी काही नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होती.
मात्र, नगरसेवक पुण्याजवळ पोहोचताच राजकीय घडामोडींना अचानक वेगळे वळण मिळाले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधला. भाजपमध्ये जाण्याऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आल्याचे समजते.
फोनाफोनी आणि चर्चेनंतर काही नगरसेवकांनी मुंबईचा प्रवास थांबवून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. तर एक नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपमध्ये होणारा संभाव्य पक्षप्रवेश तूर्तास लांबणीवर पडला असून, आता हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
या संपूर्ण घडामोडीमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
–
दोन महिन्यांपासून नगरसेवक अस्वस्थ
शिवसेना उबाठा गटातील काही नगरसेवक गेल्या दोन महिन्यांपासून अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधील पाच नगरसेवकांनी सर्वप्रथम माध्यमांसमोर येत त्यांना समर्थन दिले होते. त्यामुळे हे नगरसेवक ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील, अशी त्यावेळी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
मात्र, त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि संबंधित नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा सुरू झाली. मुंबईत पक्षप्रवेशाची तयारीही सुरू झाली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्क साधल्याने या घडामोडींना कलाटणी मिळाली.
–
उबाठाकडून संपर्कच नाही?
विशेष म्हणजे शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असताना त्यांना रोखण्यासाठी उबाठा गटातील स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित प्रयत्न झाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संबंधित नगरसेवकांशी उबाठाच्या नेत्यांनी संपर्क साधला नसल्याचेही सांगितले जात आहे.
याउलट शिवसेनेच्या नेत्यांनी वेळीच संपर्क साधत नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे भाजपमध्ये जाण्यापूर्वीच नगरसेवकांचे पाऊल थांबवण्यात शिवसेनेला यश आल्याचे मानले जात आहे.
आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि संबंधित नगरसेवकांची मुंबईतील भेट निर्णायक ठरणार आहे. या चर्चेनंतर किती नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतात आणि पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी ठरतो, याकडे धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










