आरंभ मराठी / धाराशिव
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यानंतर भाजपमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत नाराजीवर अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षात मतभेद असू शकतात, मात्र ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडले जावेत. प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे टाळावे, असा स्पष्ट सल्ला त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांना मंत्र्यांची भेट घेऊ न दिल्याचा आरोप करत त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे पक्षात खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनीही पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याची खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपमध्ये जुने आणि नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी संघटनात्मक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन केले आहे. “संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणि सक्षम नेतृत्व घडते,” असे त्यांनी म्हटले आहे. जिल्हाध्यक्षांच्या या भूमिकेमुळे भाजपमधील वाढत्या नाराजीला काही प्रमाणात आवर बसेल. पक्षांतर्गत मतभेद सार्वजनिकरित्या व्यक्त होण्याच्या घटनांमुळे संघटनेची प्रतिमा मलिन होऊ शकते, याची जाणीव करून देत त्यांनी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, असेही आवाहन केले. जिल्हाध्यक्षांच्या या सल्ल्यानंतर पक्षात सुरू असलेली अंतर्गत खदखद कमी होईल का आणि जुने-नवे कार्यकर्ते यांच्यातील समन्वय वाढेल का, याकडे आता भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










