सह्याद्री कॉर्नर–पंचायत समिती मार्गावरील अडथळा हटवला; रस्त्यामुळे नागरिकांची होत होती कोंडी, वारंवार सांगूनही आणला जात होता रस्त्यावर अडथळा
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती मार्ग तब्बल तीन आठवडे बंद ठेवल्यानंतर रविवारी रातोरात गनिमीकावा करत या मार्गावरील अडथळा हटविण्यात आला. रस्ता रोखण्यासाठी उभी करण्यात आलेली दोन्ही नादुरुस्त वाहने अज्ञात व्यक्तींकडून थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणून उभी करण्यात आल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले.
त्यामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.
विशेष म्हणजे या वाहनांवर असावा एक छंद ‘सत्तेच्या अहंकाराचा, नागरिकांचा रस्ता अडवण्याचा, नागरिकांची गैरसोय करण्याचा…’ अशा ओळी लिहून जिल्हा परिषदेसमोरील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, जिल्हा परिषदेने हा रस्ता वापरू नये. सौजन्य – नागरिक धाराशिव. अशा प्रकारची सूचना लिहिण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे आरंभ मराठीने सातत्याने लक्ष वेधले होते. सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः समता नगर परिसरातील रहिवाशांना तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानक, विविध बँका तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
जिल्हा परिषद प्रशासनाने या मार्गाच्या प्रवेशद्वारावर दोन नादुरुस्त वाहने उभी करून रहदारी रोखल्याने हा वाद अधिकच चिघळला होता. नगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे अडथळा निर्माण केल्याबद्दल विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यापूर्वीही सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच मार्गावर जिल्हा परिषद प्रशासनाने तारेचे कुंपण उभारून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत कुंपण हटवले होते. मात्र त्यानंतर पुन्हा दोन नादुरुस्त वाहने उभी करून हा मार्ग बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने नगरोत्थान महाभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेच्या हद्दीतील ५९ रस्त्यांच्या विकासासाठी १४० कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात क्रमांक २५ वर सह्याद्री कॉर्नर ते पंचायत समिती या २५० मीटर लांबीच्या आणि ९ मीटर रुंदीच्या रस्त्याचा समावेश असून, या कामासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच धाराशिव नगरपालिकेने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेशही काढला आहे.
विकासासाठी निधी मंजूर झालेला आणि कार्यारंभ आदेश मिळालेला सार्वजनिक रस्ताच प्रत्यक्षात बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत होता. आता गनिमी कावा करत रस्ता अडवणारी वाहने हटवून ती जिल्हा परिषदेच्या गेटवर उभी करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. रातोरात हा गनिमी कावा नेमका कोणी केला याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे.










