आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीपासूनच या निवडणुकीत मतदारांचा अपेक्षेइतका उत्साह दिसून आला नाही. सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 36.60 टक्के मतदान झाले आहे. दुपारच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तालुकानिहाय मतदानाची स्थिती पाहता, भूम तालुक्यात एकूण 40 हजार 302 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 39.46 इतकी आहे. वाशी तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत 24 हजार 551 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 36.85 नोंदवली गेली आहे. कळंब तालुक्यात 60 हजार 141 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 36.89 इतकी आहे..धाराशिव तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 85 हजार 513 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
मात्र, मतदारसंख्या मोठी असल्याने तेथील मतदानाची टक्केवारी 34.22 इतकीच राहिली आहे. परंडा तालुक्यात 41 हजार 272 मतदान झाले असून टक्केवारी 38.48 इतकी नोंदवली गेली आहे. तुळजापूर तालुक्यात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला. येथे एकूण 73 हजार 941 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 37.94 इतकी आहे.
लोहारा तालुक्यात 32 हजार 31 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 35.83 आहे. उमरगा तालुक्यात 61 हजार 642 इतके मतदान झाले असून तेथील टक्केवारी 35.69 इतकी नोंदवली गेली आहे. जिल्हा पातळीवर एकूण 4 लाख 19 हजार 393 मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये 2 लाख 22 हजार 243 पुरुष मतदारांचा तर 1 लाख 97 हजार 159 महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 36.60 इतकी आहे. दरम्यान, मतदानासाठी अखेरचे दोन तास शिल्लक असून या वेळेत मतदानाला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आता अंतिम दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद किती वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









