आरंभ मराठी / धाराशिव
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८वा वर्धापन दिन उद्या धाराशिव येथे साजरा करण्यात येणार असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण होणार आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत धाराशिवमधील मराठा सेवकांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न करता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करावे, अशी मागणी करणारे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उद्याच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविली असून, ओळखपत्र तपासल्यानंतरच नागरिकांना कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून, सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने प्रयाण करून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिवमधील मराठा सेवकांनी पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्याला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळखपत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्राशिवाय कोणत्याही व्यक्तीला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचा अधिकृत दौरा प्रशासनाला कळविला असला तरी, त्यामध्ये धाराशिवमधील नियोजित कार्यक्रमांचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला नाही.
सरनाईक आज सायंकाळी पाच वाजता ठाणे येथून मोटारीने सोलापूरकडे रवाना झाले असून, रात्री बारा वाजता सोलापूर येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यांचा रात्रीचा मुक्काम सोलापूर येथे राहणार असून, गुरुवारी सकाळी ते सोलापूरहून धाराशिवकडे रवाना होऊन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासोबतच उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. एकीकडे शासकीय कार्यक्रम आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक, तर दुसरीकडे मराठा सेवकांनी घेतलेली विरोधाची भूमिका यामुळे प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांनी शांतता राखून शासकीय कार्यक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.









