आरंभ मराठी / येरमाळा
‘आई राजा उदो उदो, येडूसरुचा उदो उदो’च्या गजराने येरमाळानगरी दुमदुमून गेली असताना येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला चुना वेचण्याचा सोहळा शुक्रवारी (ता. ३) अभूतपूर्व उत्साहात पार पडला. यंदा तब्बल पंधरा लाखांहून अधिक भाविकांनी या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतल्याने यात्रेने गर्दीचा नवा विक्रम नोंदविला.
सकाळी साडेआठ वाजता देवीची पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरातून वाजतगाजत आमराई मंदिराकडे प्रस्थान पावली. पालखी चुन्याच्या रानात दाखल होताच लाखो भाविकांनी चुनखडीचे खडे वेचून पालखीवर अर्पण करत ‘आई राजा उदो उदो’चा एकच जयघोष केला. भाविकांच्या या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर अपार श्रद्धा, ऊर्जा आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले.
अनेक भाविकांनी हा अविस्मरणीय क्षण डोळ्यांत साठवून ठेवताना दोन क्षण डोळे मिटून देवीचे स्मरण केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी दाखल झाले होते.
यात्रेनिमित्त देवीची पालखी आता पुढील पाच दिवस आमराई मंदिरात मुक्कामी राहणार असून या काळात पशुप्रदर्शन, आराध्यांचा मेळा, कुस्ती स्पर्धा, शोभेच्या दारूची आतिषबाजी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. ७) घुगरी महाप्रसादानंतर देवीची पालखी मुख्य डोंगरावरील मंदिराकडे प्रस्थान करणार असून त्यानंतर यात्रोत्सवाचा समारोप होणार आहे.
दरम्यान, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तुळजाभवानी देवस्थानचे महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते हेलिकॉप्टरद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या दृश्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यात्रेच्या पारंपरिक प्रथेनुसार, पालखी परतल्यानंतर मंदिर चुन्याने रंगवले जाते. त्यामुळे चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा पिढ्यान् पिढ्या जपली जात असल्याने दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभागी होतात.
पालखी मार्गावर बाजार चौक, वाणी गल्ली, रोकडेश्वर मारुती मंदिर चौक, छत्रपती मार्केट, संभाजीनगर रस्ता येथे महिला भाविकांनी रांगोळ्या काढून व फुलांची सजावट करून वातावरण अधिक मंगलमय केले होते.
भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तथापि, यात्रेनंतर परतीच्या प्रवासात वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने सोलापूर-बीड महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू होती. यात्रेदरम्यान इंटरनेट सेवा विस्कळित झाल्याने शनिवारी दुपारपासून रविवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन व्यवहारही ठप्प झाल्याचे दिसून आले.









