आरंभ मराठी / धाराशिव
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार असून, ग्रामपंचायत निवडणुकांची उलटगणती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात आदेश जारी केले असून, त्यानुसार २० फेब्रुवारी २०२६ पासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना ७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, अंतिम प्रभाग रचना ४ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
तीन टप्प्यांत पार पडणार प्रक्रिया –
प्रभाग रचनेची संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार असून, त्याची जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीने २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित गावांचे नकाशे अंतिम करतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष पाहणी करून २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रभाग निश्चित करतील. तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर २३ मार्च २०२६ पर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल आणि आयोगाकडून त्यास मान्यता दिली जाईल.
हरकतींसाठी नागरिकांना संधी –
प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपली मते आणि हरकती नोंदवण्याची संधी देण्यात येणार आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर १३ एप्रिल २०२६ पर्यंत हरकती नोंदवता येतील. प्राप्त हरकतींवर २१ एप्रिल २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. त्यानंतर जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम प्रभाग रचना निश्चित करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात ४२८ ग्रामपंचायतींवर प्रशासक –
धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४२८ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपलेली आहे. या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे सध्या ग्रामसेवकच ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार पाहत आहेत.
जून-जुलैमध्ये निवडणुकांची शक्यता –
प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. वेळापत्रकानुसार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जून किंवा जुलै २०२६ महिन्यात पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









