आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेना महायुतीने सावंत गटाला बाजूला ठेवून सत्ता समीकरणाची जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणूक निकालानंतर महायुतीत फुट पडण्याच्या आणि काही सदस्य वेगळे होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून शिवसेनेचे बहुसंख्य सदस्य भाजपासोबत उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचा गट महायुतीपासून दूर राहिल्याने राजकीय समीकरणात वेगळे वळण आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप या महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी भाजपविरोधी भूमिका घेतल्याने त्यांचे समर्थक असलेले आठ जिल्हा परिषद सदस्य स्वतंत्र गटात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
दुसरीकडे शिवसेनेचे इतर सात सदस्य मात्र भाजपसोबत कायम राहिले असून त्यांनी महायुतीवरील विश्वास कायम ठेवला आहे.
दरम्यान, आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील देखील उपस्थित होते.
या बैठकीनंतर महायुतीतील बहुतांश सदस्य एकत्र असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामविकास विभागाने चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्हा प्रशासनाने दिनांक १३ मार्च २०२६ रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सध्याच्या घडीला भाजपचे १९, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६, सावंत गट वगळून शिवसेनेचे ७ आणि २ अपक्ष असे एकूण ३४ सदस्य महायुतीच्या बाजूने असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत असून अध्यक्षपदावर महायुतीचाच उमेदवार विराजमान होणार हे निश्चित मानले जात आहे. अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चनाताई पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत संभाव्य उमेदवारांबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी महायुतीकडून सर्वसंमतीने उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे शिवसेना (उबाठा) पक्षाला जिल्हा परिषदेत ७ जागा मिळाल्या असून काँग्रेसला ३ जागांवर यश मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) पुरस्कृत एक अपक्ष सदस्य देखील निवडून आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकूण ११ जागा झाल्या आहेत.
आता सावंत गट देखील विरोधी बाकांवर बसण्याची शक्यता असल्याने विरोधकांची संख्या वाढणार असून जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
सावंत गट वेगळा राहिल्यानंतरही महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा आणि उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा असणार आहे.








