आरंभ मराठी / येरमाळा
कळंब तालुक्यातील चोराखळी परिसरात पहाटेच सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली आहे. कालिका सांस्कृतिक कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव यांच्या घरात सहा आरोपींनी घुसखोरी करून पिस्तूल आणि लोखंडी सुरा दाखवून तब्बल ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
चोराखळी येथील रहिवासी व कालिका कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव (वय ४५) या आपल्या कुटुंबासह दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. त्यांच्या सोबत लहानपणापासूनची मैत्रीण रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी) आणि शिवम उर्फ गळ्या गंगावणे देखील राहत होते. तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांचा कलाकेंद्रावर ये–जा सुरू होता. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार यांनी घरफोडीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील केल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास, त्यांनी इनोव्हा गाडीतून बार्शी येथून चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचे जाणवले. साडेपाचच्या सुमारास, घराचे दार उघडे असतानाच अर्धवट कापडाने चेहरा झाकलेले सहा आरोपी घरात शिरले. त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्यावर पिस्तूल लावले, तर दुसऱ्या आरोपीने रेखा शिंदे यांच्या गळ्यावर लोखंडी सुरा लावला. आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपींनी निर्मला जाधव यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखले गेले, परंतु जीवाच्या धोक्यामुळे तात्काळ ओळख उघड केली गेली नाही. या प्रकरणात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपी आणि महादेव घुले यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. येरमाळा पोलीस स्टेशनकडून तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस कार्यरत आहेत, असे सपोनि तात्या भालेराव यांनी सांगितले.








