आरंभ मराठी : औसा/लातूर
लातूर जिल्ह्याच्या प्रशासकीय विकासासाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून, आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. लातूर येथे स्वतंत्र अपर विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी आमदार पवार यांनी लातूरसह धाराशिव, नांदेड, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील नागरिकांना सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या एकमेव विभागीय आयुक्त कार्यालयावर अवलंबून राहावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाची घोषणा करूनही ती अद्याप प्रत्यक्षात आलेली नसल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध शासकीय विभागांची २५ पेक्षा अधिक कार्यालये कार्यरत आहेत. स्वतंत्र विभागीय आयुक्तालयासाठी नागरिकांकडून मागील १५ वर्षांपासून सातत्याने मागणी होत असून, न्यायालयीन लढा आणि आंदोलनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न पुढे नेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लातूर येथे विभागीय आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि अद्ययावत इमारतही तयार आहे. शासनाने नेमलेल्या दांगट समितीने २०१५ मध्ये लातूरला प्राधान्य देत सकारात्मक शिफारस केली होती, मात्र त्या अहवालावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने हा प्रश्न प्रलंबितच आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, जनतेची महसुली व प्रशासकीय कामे सुलभ आणि जलद व्हावीत, तसेच होणारी गैरसोय तात्पुरती का होईना कमी व्हावी, यासाठी स्वतंत्र विभागीय आयुक्तालय मंजूर होईपर्यंत लातूर येथे अपर विभागीय आयुक्त कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशी ठाम आणि आग्रही मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, लवकरच याबाबत योग्य आणि ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लातूरसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय झाल्यास प्रशासकीय व्यवस्था अधिक कार्यक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होणार असून नागरिकांची धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
लातूरकरांच्या दीर्घकालीन आणि जिव्हाळ्याच्या मागणीला मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.








