मोलाचा सल्ला.. ‘बस’चे राजकारण, श्रेयवादाचा थिल्लरपणा थांबवा.., अजूनही सुधारणेस वाव आहे!
आरंभ मराठी / धाराशिव
उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांबाबत आणि स्थानिक माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संदर्भाने घेतलेल्या भूमिकेबाबत कडक शब्दात सुनावत सामाजिक कार्यकर्ते ॲड.शीतल चव्हाण यांनी आमदार स्वामी यांचे कान टोचले आहेत. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ठाकरे गटासोबत गद्दारी केली म्हणूनच स्वामींना मतदारसंघाने निवडून दिलेले असताना त्यांनी विरोधातील शिंदे गटाच्या नेत्यांसोबत साधलेली जवळीक म्हणजे प्रवीण गुर्जी, निघाले फर्जी म्हणायला वाव असल्याची खरमरीत टीका ॲड. चव्हाण यांनी केली आहे. ॲड.चव्हाण यांनी एकूणच मतदारसंघाची भावना यातून स्पष्ट केली आहे. तसेच आमदार स्वामींना सुधारण्याची अजूनही संधी असल्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काय म्हणाले ॲड शीतल चव्हाण..?
2009 ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदार संघातील लोकांनी वर्गणी गोळा करून प्रयोगशाळा सहाय्यक असलेल्या ज्ञानराज चौगुले यांना निवडून आणले.त्यांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली आणि तीच पुनरावृत्ती 2024 मध्ये मतदारांनी केली. प्रवीण स्वामी यांना निवडून दिले. पण ज्या मुद्द्यावर, अपेक्षेने त्यांना निवडून आणले त्याचा आमदार स्वामींना विसर पडला आहे.
2009 ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदार संघातील लोकांनी वर्गणी गोळा करून प्रयोगशाळा सहाय्यक असलेल्या ज्ञानराज चौगुले यांना आमदार केले. नंतरची दोन ‘टर्म्स’ चौगुले हेच आमदार राहिले. 2024 ला साधे प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रवीण स्वामी यांना जनतेने 2009 ची पुनरावृत्ती करीत वर्गणी गोळा करून आमदार केले.
अलीकडे ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी यांच्या कार्यकर्त्यांत उमरगा-लोहरा भागात सुरु असलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यावरून तुंबळ वाकयुद्ध झाले. उथळ कार्यकर्त्यांची ही चर्चा पाहिली तर ही विकास कामे जणू काही आजी-माजी आमदार महोदयांनी आपापली घरदारे, शेतजमिनी वगैरे विकून केली आहेत की काय असे वाटण्याईतपत श्रेय घेण्याभोवतीच गुरफटलेली आहेत. हे सगळे पाहून या सगळ्याचे श्रेय जनतेचेच आहे कारण जनतेनेच या दोघांनाही वर्गण्या गोळा करून निवडून दिले आणि जनतेच्याच करातून ही कामे झाली असल्याने जनतेला सगळे श्रेय देऊन, अंतिमत: जनताच मालक असल्याचे मान्य करीत आपण फक्त कर्तव्यापुरते निमित्तमात्र आहोत.
थिल्लरपणा बंद करा!
श्रेयवादाच्या या लढाईने एवढा अतिरेक केला आहे की सोशल मीडियावरील चर्चा, रस्त्यावरील सार्वजनिक खांब, जागोजागीचे होर्डिंग्ज याच एका कारणासाठी रंगवले गेले आहेत. असंख्य गंभीर प्रश्न आजही प्रलंबीत असलेल्या मागास भागात आपल्या कामाचा व कर्तव्याचा भाग म्हणून केलेल्या कामासाठी ही जी ‘शो’बाजीची स्पर्धा रंगली आहे, तिचा जनतेला अक्षरश: विट आला आहे. ‘भीक नको पण कुत्रं आवर’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. दोन्ही बाजूने चाललेला हा थील्लरपणा आता बंद झाला पाहिजे.
एस.टी.ची मागणी महामंडळाच्या धाराशिव विभागाने सर्वप्रथम केली होती, श्रेय मात्र आजी व माजी आमदार घेत आहेत.
शिवसेना-उबाठाच्या आमदाराकडून गद्दार म्हंटल्या गेलेल्यांचे सत्कार, औक्षणें, फटाके फोडून स्वागत. ‘प्रवीण गुरुजी, निकले फर्जी?’ – कार्यकर्त्यांध्ये संभ्रम
आमदार प्रवीण स्वामी हे विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीचा फॉर्म भरेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. या अर्थाने ते राजकारणी नव्हते. त्यांना निवडून देण्यामागे शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणत त्या गटाविरुद्ध आक्रमकपणे लढणाऱ्या शिवसेना (उबाठा)च्या निष्ठावान शिवसैनिकांचे फार मोठे योगदान आहे. शिवसेना पक्ष फुटल्यांनतर फुटून गेलेल्या आमदारांना ‘खोकेबाज’ व ‘गद्दार’ ठरवत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी फुटीर आमदारांचा आजवर दुस्वास केला आहे. एवढेच काय दोन्ही गटाचे प्रमुख आजही एकमेकांसमोर आल्यावर एकमेकांकडे बघणे देखील टाळत आहेत, इतके वितुष्ट या दोन गटात आलेले आहे. आजही निष्ठावंत शिवसैनिक गद्दार ठरवलेल्याना आपल्या सावलीलादेखील उभे करणे पसंत करीत नाहीत. अशी परिस्थिती असताना, ‘गद्दार विरुद्ध निष्ठावंत’ हीच या राजकीय लढाईची प्रमुख भूमिका बनलेली असताना उमरगा-लोहारा मतदार संघाच्या शिवसेना (उबाठा) आमदार महोदयांनी मात्र गद्दार गटातील प्रतापराव सरनाईक यांसह स्थानिक नेत्यांना आपल्या घरी बोलावून, त्यांचे आतिषबाजी करून स्वागत करणे, औक्षण करणे असा प्रकार केल्याने शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना धक्का बसला आहे. इथले नवखे आमदार थेट पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वागत असल्याने ज्यांना ‘सबकी मर्जी, प्रवीण गुरुजी’ असे म्हणत निवडून आणले, त्यांना आता ‘प्रवीण गुरुजी, निकले फर्जी’ असे म्हणण्याची वेळ तर येणार नाही ना?, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे. किंबहूना अशी चर्चा विरोधी लोकांनीच पसरवली आहे आणि ती पसरवण्यास पूरक कृती आमदार महोदयांकडून करून घेतल्या जात आहेत. अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे गळ्यात शिवलिंग असेल तोपर्यंत हातात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन असेल ही निष्ठा ते पाळतील याबद्दल दुमत नाही पण पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या व स्थानिक पुढाऱ्यांच्या ताठर भूमिकेस पूरक भूमिका नसणे हेदेखील कार्यकर्त्यांना दुखावणारे, विरोधकांद्वारे संभ्रम निर्माण करण्यास वाव देणारे ठरते.
माजी आमदार महोदयांना गद्दार, खोकेबाज ठरवत त्यांच्यावर कडक टीका करत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी रोष पत्करला, त्याच माजी आमदारासोबत आपल्या गटाचे आमदार हसत गळाभेटी घेताना पाहून आपण वेड्यात निघालो आहोत अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांचा सद्य आमदाराच्या ताठर भूमिकेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
‘नाही रे’ वर्गाने ‘आपला’ म्हणून निवडून दिलेले आमदार फोटोबाजीत व प्रस्थापितांच्या घोळक्यात मशगुल झाले आहेत काय?
प्रवीण स्वामी यांना सर्वसामान्य जनतेने आमच्यातलाच एक समजून निवडून दिले आहे. ‘गब्बर विरुद्ध गरीब’ अशा लढाईत ‘गरीब’ म्हणून त्यांना निवडून दिले गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रास्थानी ठेवून कारभार करायला हवा. पण निवडून जाताच त्यांच्या वर्तनात बदल दिसून येऊ लागले आहेत. सतत फोटोसेशन करणे, ते सोशल मीडियावर फिरवत राहणे, एखादा नवखा कार्यकर्ता नेता दिसताच त्याच्या शेजारी जात फोटो काढून घेण्यासाठी धडपडतो व त्या फोटो तात्काळ सोशल मीडियावर फिरवतो तशाच प्रकारचे वर्तन आमदार पदाची गरीमा विसरून ते करीत असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच विविध पक्षाच्या आणि बहुतांश करून आपल्या विरोधी पक्षाच्या मातब्बर नेते मंडळीसोबत फोटोसेशल केले जात आहे व ते तत्परतेने व्हायरल केले जात आहे, याबद्दलही सर्वसामान्यामध्ये नाराजीचा सूर निघत आहे. ‘नाही रे’ वर्गाने ‘आपला’ म्हणून निवडून दिलेल्या आमदाराने इतक्या कमी कालावधीत असे प्रस्थापितांसोबत व खासकरून विरोधी पक्षाच्या प्रस्थापितांसोबत व फोटोसेशन्समध्ये गुरफटून जाणे सर्वसामान्य लोकांना रुचत नाहीये. याबाबत लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
आमदार महोदयांच्या बदलत्या वर्तणुकीचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांत बसू शकतो.
2024 साली उमरगा – लोहारा भागात झालेल्या सत्ता परिवर्तनासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, इतर सामाजिक संघटना, चळवळीतील कार्यकर्ते यांचे योगदान महत्वाचे आहे. पण निवडणूक संपताच ही बांधणी कोलमडून पडली. निवडून आलेल्या आमदार महोदयांनी ज्यांची ज्यांची मदत निवडून येण्यासाठी घेतली त्यांच्यासोबतचा संवाद मर्यादित केला. निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणे थांबले. “लढताना सगळे आणि कारभार हाकताना ‘एकला चलो रे’ ..” अशी कार्यपद्धती पुढील रणनीतीसाठी घातक ठरु शकते. त्यातच गद्दारांसोबत गळाभेटी झाल्याने ‘गद्दार विरुद्ध निष्ठावंत’ हा लढाईत मुख्य प्रेरणा ठरणारा घटक क्षीण झाला. निवडणूकी नंतर जर सगळे मातब्बर एक होणार असतील तर आम्ही कोणासाठी व कशासाठी लढावे ही भावना बळावली. एकंदर पाहता भूमिका, विचार, धोरण यावरचा विश्वास उडाला. प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या चळवळीतल्या नेत्यावर हल्ला झाल्यावर जी बोटचेपी भूमिका घेतली गेली, त्यामूळे पुरोगामी समर्थक दुःखावले गेले. राज्य सरकारच्या धोरणांविरुद्ध आक्रमकता न दाखवल्याने कार्यकर्त्यामध्ये ‘स्पिरिट’ उरला नाही. या सगळ्या कारणाने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ‘मविआ’ साठी अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. स्वत:ची निवडणूक जिंकून झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या निवडणूकांत या आव्हानांचा सामना करीत, कार्यकर्त्यांना निवडून आणत त्यांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आता आमदार प्रवीण स्वामी यांच्यावर आहे.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)