आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी जिल्ह्यातील एकूण 1,308 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू आहे.
निवडणूक विभागाकडून सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांतील मतदानाची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 7.47 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या दोन तासांत तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 8.50 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. तुळजापूर तालुक्यात एकूण 16,569 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
भूम तालुक्यात 8,528 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 8.35 इतकी आहे. लोहारा तालुक्यात 6,792 मतदान होऊन 7.60 टक्के तर परंडा तालुक्यात 8189 मतदानासह 7.64 टक्के मतदान नोंदले गेले आहे.
वाशी तालुक्यात 4,799 मतदारांनी मतदान केले असून तेथील टक्केवारी 7.20 इतकी आहे. कळंब तालुक्यात 11,336 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 6.95 आहे.
उमरगा तालुक्यात 11,339 मतदारांनी मतदान करत 6.57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. धाराशिव तालुक्यात संख्येने सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 18,038 मतदारांनी मतदान केले; मात्र टक्केवारी 7.22 इतकी आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 11 लाख 45 हजार 888 मतदार असून यामध्ये 6 लाख 5 हजार 843 पुरुष आणि 5 लाख 40 हजार 37 महिला मतदारांचा समावेश आहे. पहिल्या दोन तासांत 54,318 पुरुष मतदारांनी आणि 31,272 महिला मतदारांनी मतदान केले.
एकूण जिल्ह्यात 85,590 मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येत असून विविध राजकीय पक्षांकडूनही मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुढील तासांत मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास निवडणूक यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.











