वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील प्रकार,
आरंभ मराठी / वाशी
पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा, अन्यथा काम थांबवा, म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार करत क्रूरता गाठली. विशेष म्हणजे कंपनीच्या बाजूने बळ दाखविणाऱ्या पोलिसांनी शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता दादागिरी केली असून,त्यामुळे संताप निर्माण झाला आहे. सदरील घटना वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.
याविषयी मिळालेली माहिती अशी की, तांदुळवाडी परिसरात गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे २ टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला आहे तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा, अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. त्यामुळे त्यांनी टॉवरचे काम थांबवले होते.
मात्र पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मवेजा देण्याच्या ऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली.
यावेळी भाजपा नगरसेवक राजु कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मात्र शेतकरी आणि भाजपा नगरसेवक राजु कवडे यांच्यावर अमानुष लाठीमार केला.
पोलिसांची ही लाठीमार करण्याची ही दुसरी वेळ असून, मागील आठवड्यातही पोलिसांनी अशाच प्रकारे लाठीमार केला होता.
जमिनीचा योग्य मावेजा मिळावा, यासाठी वाशी तालुक्यातील शेतकरी मागील काही महिन्यांपासून संघर्ष करत आहेत. मात्र त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. उलट शेतकऱ्यांवर अमानुष लाठीहल्ला करुन क्रूरतेची सीमा गाठली आहे.
कंपनीसोबत पोलिसांची सलगी, शेतकऱ्यांनाच केले जातेय टार्गेट,
अलीकडे पवनचक्की आणि सोलर प्रकल्पासाठी जमिनी खरेदी तसेच भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. यादरम्यान काही शेतकरी जमिनी अल्प दराने देतात, मात्र शेजारच्या अन्य शेतकऱ्यांनी देखील याच पद्धतीने जमिनी द्याव्यात,अशी कंपनीची अपेक्षा असते. मात्र, जमीन देण्यास संमती नसलेल्या शेतकऱ्यांवर दमदाटी केली जाते. त्यातून संघर्ष निर्माण होत आहेत. मात्र, कंपन्यांना धार्जिणे असलेल्या पोलिस प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर हात उचलले जात आहेत. मात्र, हात उचलताना पोलिसांनी शेतकऱ्यांची बाजूही समजून घ्यायला हवी.