पत्रकार सतीश मातने यांच्या पत्रानंतर संवेदनशील उपक्रमाला बळ
आरंभ मराठी / धाराशिव
आसमानी संकटाने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे घरटी, शिवारं आणि गोठे वाहून गेले. जनावरं मृत्युमुखी पडली, संसार उद्ध्वस्त झाला. अनेकांच्या उपजीविकेचा आधार हरपला. मात्र, या वेदनेच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक हृदयस्पर्शी आणि संवेदनशील उपक्रम धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हाती घेतला आहे.
मंत्री सरनाईक यांच्या वतीने १०१ दुभती गोवंश जनावरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देण्यात येणार आहेत.एका उद्ध्वस्त संसाराला पुन्हा उभं करण्याचे काम केले जाणार आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात या शेतकऱ्यांना पुन्हा आनंद मिळवून देण्याचा हा उपक्रम समाजात मानवतेचा सुगंध पसरवणारा ठरणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रा. सतीश मातने यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा आम्हाला पत्राद्वारे कळवली. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली.
त्यामुळे त्यांच्या संसाराचा आर्थिक कणा पूर्णपणे मोडला. म्हणून अशा शेतकऱ्यांना नव्याने उभं राहण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही या दुभत्या जनावरांची भेट देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी दिवाळीनिमित्त सरनाईक कुटुंबाकडून पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष भेट दिली जाते. मात्र, यंदा ती भेट सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा संसार पुन्हा फुलावा, त्यांच्या गोठ्यात पुन्हा जनावरांचे हंबरणे घुमावे, आणि त्यांच्या घरात पुन्हा दिवाळीचा प्रकाश यावा, हीच आमची खरी दिवाळी भेट आहे,असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
ते पुढे म्हणाले,शेतकऱ्यांचा संसार फक्त सरकारी मदतीवर उभा राहणार नाही. आपण सर्वांनी समाजभावनेतून पुढे येऊन त्यांना हात द्यावा. कारण शेतकऱ्याला उभं करणं म्हणजे आपल्या भूमीचं, आपल्या अन्नदात्याचं पुनर्जन्म घडवणं आहे.
या उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. ज्या घरांत काळ्या ढगांनी अंधार पसरवला होता, त्या घरांत आता आशेचा दीप पुन्हा पेटला आहे. दुभती जनावरे मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक स्थैर्य मिळण्याची आणि त्यांच्या संसाराला नवचैतन्य प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
उध्वस्त संसाराला नवजीवन देण्याचा संकल्प,
ही फक्त एक दिवाळी भेट नाही, तर एका उद्ध्वस्त संसाराला नवजीवन देण्याचा पवित्र संकल्प आहे. या उपक्रमाद्वारे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खरी दिवाळी म्हणजे फटाक्यांचा आवाज नव्हे, तर संकटग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश पेटवण्याचे नाव आहे,हे दाखवून दिले आहे.
– अभिजीत भोसले,
जनसंपर्क अधिकारी, परिवहन मंत्री