आरंभ मराठी / धाराशिव
अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्हातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळणार आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीन, उभे पीक आणि गोठ्यातील पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे.
त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गाईंचे वितरण रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) संपन्न होणार आहे.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, अवकाळी पावसाच्या तडाख्याने धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले.
शेतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली. परिणामी,शेतकऱ्यांचे जीवनचक्र ठप्प झाले. ही वेदना स्थानिक पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोहोचवताच, क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. संपूर्ण देशभरातून चांगल्या प्रतीच्या देशी गाई शोधून, त्यापैकी गुजरात येथील गीर प्रजातीची गाय आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. या गाईची किंमत 75 ते 80 हजार रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील स्थानिक देशी गाईंपेक्षा हिचे दूध उत्पादन दुप्पट आहे. सध्या देशी गायींच्या दुधाला सरासरी 80 रुपये इतका दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील यातूनच चांगले मिळेल त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार प्राप्त होईल, म्हणून ‘ गिर ‘ जातीच्या गाई बाधित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
विशेषतः कळंब, भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका अधिक बसल्याने, या भागातील पशुधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, पुन्हा स्वावलंबनाचा मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने हे वितरण करण्यात येत आहे. ही केवळ गाईंची भेट नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा दूधाळ आशा, आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत आणणारी मायेची हमी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.









