प्रियंवदा म्हाडदाळकर नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी
आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची अखेर बदली झाली असून, पदोन्नतीने त्यांची सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी उशिरा यासंदर्भातील आदेश जारी केले. डॉ. घोष हे सांगलीचे विद्यमान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची जागा घेणार आहेत. डॉ. मैनाक घोष यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्यावर भर दिला. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे नवोदय तसेच इतर शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
डॉ. घोष यांच्या जागी आता प्रियंवदा म्हाडदाळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंवदा म्हाडदाळकर या 2021 च्या यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अधिकारी असून त्या मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
त्यांनी मुंबई येथील व्हीजेआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी मार्च 2024 मध्ये तुळजापूर पालिकेत एक महिना काम केल्यामुळे त्यांना धाराशिव जिल्ह्याची चांगली ओळख आहे.
वडिलांच्या निधनानंतरही कर्तव्याला प्राधान्य
डॉ. मैनाक घोष यांच्या कार्यशैलीतील कर्तव्यनिष्ठेचा प्रत्यय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगातही आला. अतिवृष्टीच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, या दुःखद प्रसंगातही त्यांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवले नाही. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
विशेष म्हणजे, वडील आजारी असताना त्यांनी त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार केले. सामान्य नागरिकाप्रमाणे ते दररोज रात्री रुग्णालयात वडिलांच्या जवळ बसून त्यांची सेवा करत होते, तसेच कार्यालयीन कामकाजातही कोणतीही तडजोड न करता वेळेवर हजर राहत होते. त्यांच्या या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे प्रशासनात शिस्त निर्माण झाली आणि सर्व स्तरांतून त्यांच्या कामाचे कौतुक झाले.








