आरंभ मराठी / धाराशिव
मातंग समाजाच्या तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मार्ग मिळाला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकासाठी शासकीय दुग्ध डेअरी येथील एक एकर जागा नगरपरिषद धाराशिवकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयानंतर नगरपरिषद सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
धाराशिव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मातंग समाजाकडून मागील ४० वर्षांपासून केली जात होती. या स्मारकासाठी शासकीय दुग्ध डेअरीची एक एकर जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जागेची शासकीय किंमत सुमारे २ कोटी ८ लाख रुपये इतकी होती.
ही रक्कम नगरपरिषदेकडून शासनाला भरावी लागणार होती; मात्र नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही जागा विनामूल्य देण्यात यावी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर महायुती सरकारने ही जागा स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश दिल्यानंतर सोमवारी (१६ मार्च) तहसील कार्यालयाकडून नगरपरिषद धाराशिवच्या नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत ताबा पावती देण्यात आली. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, सोमवारी झालेल्या नगरपरिषद सर्वसाधारण सभेत या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
जागेचा ताबा नगरपरिषदेकडे मिळाल्यानंतर मातंग समाज बांधवांनी स्मारक उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी जल्लोष केला. यावेळी नगराध्यक्षा नेहा काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, राहुल काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे, पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, वंदना पवार, दत्ता पेठे, बापू पवार, किसन पेठे, खंडू चांदणे, सुमित क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.









