आरंभ मराठी / धाराशिव
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस व कच्च्या तेलाच्या आयातीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये गॅस सिलेंडर मिळेल की नाही याबाबत भीती निर्माण झाली असून धाराशिव शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून हजारो नागरिक गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर रांगा लावताना दिसत आहेत.
या परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासनाने सर्व गॅस एजन्सींना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी धारक व व्यवस्थापकांनी आपल्या कार्यालयाच्या तसेच गॅस सिलेंडर वितरणाच्या ठिकाणांच्या दर्शनी भागावर आवश्यक माहितीचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या फलकावर दररोजची एलपीजी गॅस सिलेंडरची आवक-जावक याचा तपशील, गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचे दूरध्वनी क्रमांक तसेच तक्रार निवारणासाठी अधिकृत प्रतिनिधीचे संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच नागरिकांना पारदर्शक माहिती उपलब्ध व्हावी आणि अनावश्यक अफवा पसरू नयेत यासाठी ही माहिती सर्वांना सहज दिसेल अशा ठिकाणी प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घेण्याचेही एजन्सी धारकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन महत्त्वाचे सण येत असल्यामुळे गॅस सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असताना प्रशासनाने पारदर्शकता आणि माहितीची उपलब्धता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.








