आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या केवायसीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाल्याची बातमी समोर आली आहे. यामधे धाराशिव जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांचा समावेश आहे.
या महिलांना यापुढे कधीच 1500 रुपये मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. जुलै 2023 मध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती. सुरुवातीला जेव्हा योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 41 लाख इतकी होती. धाराशिव जिल्ह्यात या योजनेच्या अगदी सुरुवातीला 4 लाख 16 लाभार्थी महिला होत्या.
या महिलांना जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यात नियमित 1500 रुपये मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर हळूहळू लाभार्थी महिलांची संख्या कमी कमी होत गेली. डिसेंबर 2023 मध्ये 3 लाख 92 हजार, पुढच्या महिन्यात 3 लाख 70 हजार असे करत करत लाभार्थी महिलांना दर महिन्याला वगळण्यात आले. जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज अचानक बाद करण्यात आले आहेत.
सुरू असलेला हप्ता अचानक बंद झाल्यानंतरच लाभार्थी महिलांना आपण योजनेतून बाद झालो आहोत हे समजते. सध्या या योजनेच्या धाराशिव जिल्ह्यात फक्त 2 लाख 90 हजार लाभार्थी महिला असल्याचे समजते. लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील 36 हजार महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे.
परंतु केवायसी करूनही या 36 हजार महिलांना मागील तीन महिन्यांपासून हप्ताच मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे योजनेत पात्र असूनही या महिलांना हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. या 36 हजार लाडक्या बहिणींना 16 कोटी 20 लाख रुपयांना मुकावे लागले आहे.
जिल्हा पातळीवर असलेल्या या योजनेच्या व्यक्तीकडे केवळ योजनेत महिला पात्र आहे की अपात्र आहे एवढीच माहिती मिळते.
बाकी जिल्ह्यातील एकूण लाभार्थींची संख्या, वगळलेल्या लाभार्थींची संख्या याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे या योजनेत सर्वत्र सावळा गोंधळ असल्याचे चित्र दिसत आहे. योजनेच्या सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार महिला लाभार्थी होत्या. सध्या ही संख्या 2 लाख 90 हजार इतकी आहे. म्हणजे सव्वा लाख महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे.
काही महिलांचे वय अचानकच 65 वर्षांपेक्षा अधिक दाखवून त्यांना बाद करण्यात आले आहे तर काही महिलांना एकाच घरात डबल लाभ घेत असल्याचे कारण दाखवून बाद करण्यात आले आहे. योजनेतून अचानक बाद करण्यात आल्यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांना बाद केल्यामुळे शासनाचे दर महिन्याला तब्बल 19 कोटी रुपये वाचत असले तरी निकषात बसणाऱ्या महिलांना अचानक बाद केल्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
सध्या जिल्हाभरातील अपात्र झालेल्या महिला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असलेल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयात खेटे घालत आहेत. परंतु त्यांना त्या का अपात्र झाल्यात याची समाधानकारक उत्तरे मिळतच नाहीत. लाभ बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याची महिलांची तक्रार आहे.
पात्र-अपात्र निकषांबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे महिलांचा गोंधळ वाढला आहे. लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आधार देणे हा असला तरी अंमलबजावणीतील त्रुटीमुळे धाराशिव जिल्ह्यातील हजारो महिला सध्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.








