आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक केल्यामुळे धाराशिव येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. महिला, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी या सवलतधारक प्रवाशांना कार्ड काढणे आवश्यक असल्याने बसस्थानकात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. याच गर्दीचा फायदा घेत काही एजंटांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याचे समोर आले होते.
अधिकृतरित्या १९९ रुपयांत मिळणारे NCMC कार्ड २५० ते ३०० रुपयांपर्यंत विकले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. धाराशिव जिल्ह्यातील NCMC कार्ड वितरणाचे टेंडर बार्शी येथील एका व्यक्तीला देण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एजंटमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत सुमारे २०० रुपयांत मिळणारे हे कार्ड अचानक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दराने दिले जाऊ लागले.
धाराशिव बसस्थानकात २५० रुपये, तुळजापूर येथे २५० रुपये, तर कळंब येथे २३० रुपये असे दर आकारले जात होते. काही ठिकाणी तर खासगी जागेवरून कार्ड देताना ३०० रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकाराविरोधात काही प्रवाशांनी माध्यमांद्वारे आवाज उठवल्यानंतर बसस्थानकातील एजंटांनी मागील चार दिवसांपासून कार्ड काढण्याची सेवा पूर्णपणे बंद केली आहे.
त्यामुळे आता उलट परिस्थिती निर्माण झाली असून, कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या बसस्थानकातील काउंटरबाहेर महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी होत असून, सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांचे विशेष हाल होत आहेत. कार्ड सेवा का बंद आहे, ती पुन्हा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही अधिकृत सूचना बसस्थानकात लावण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेच परिवहन खात्याचा कारभार असताना त्यांच्या जिल्ह्यातच NCMC कार्ड प्रक्रियेत गोंधळ व गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ही सेवा तातडीने सुरू करून निश्चित दरात पारदर्शक पद्धतीने कार्ड वितरण करावे, तसेच जास्त पैसे घेणाऱ्या एजंट वर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.










